तुमच्या घाणेरड्या प्रकरणावर पांघरुन घालण्यासाठी राज्यात कोरोना वाढतोय का?मनसेचा आक्रमक सवाल
गुजरात,कर्नाटक या राज्यात कोरोनाच्या पेशंटच्या संख्येत घट होते आणि महाराष्ट्रात ही संख्या कशी वाढते ? मनसेची घणाघाती टिका
राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये कमालीची वाढ होत असल्याचे गेल्या महिनाभरापासून लक्षात येते. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागू करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. संपुुुुर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे कडक निर्बंध लावले जातायेत त्याला विरोध केला जातोय.मनसेकडूूून महाराष्ट्राला लागून असलेल्या गोवा, कर्नाटक आणि गुजरात या तिनही राज्यात कोरोना नाही, फक्त महाराष्ट्रातच कोरोना कसा वाढतोय ? असा प्रश्न मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी विचारलाय.
राज्य सरकारकडूनच कोरोनाचा बाऊ केला जातोय, कोरोनाच्या नावाखाली लोकांना भीती दाखवली जाते असा आरोप मनसेकडून सातत्याने केला जातोय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: मास्क वापरायच्या भूमिकेच्या विरोधात आहेत. त्यांनी वेळोवेळी आपल्या कृतीतून ते दाखवून दिलं आहे.
तुमचे घाणेरडे प्रकरण बाहेर येतायेत म्हणून कोरोना वाढतोय का? महाराष्ट्राला लागून असलेल्या राज्यात कोरोना नाही, मग महाराष्ट्रातच तो कसा वाढतोय? सरकारचं कोरोनावर का कोरोनाचं सरकारवर प्रेम आहे ? असे सवाल मनसेने राज्य सरकारला विचारले आहेत. सरकार जर एवढे जर कडक निर्बंध लावत असेल तर जनतेला काही सवलती देणार का? असाही सवाल मनसेने राज्यातल्या महाविकास आघाडीला विचारला आहे.
कोरोना रुग्ण संख्या कमी होते तेंव्हा आदित्य ठाकरे यांचा ‘वरळी पॅटर्न’ आणि कोरोना रुग्ण वाढले की लोक बेजबाबदार अशी बोचरी टीका मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर केली आहे. जनतेने काम करायचे नाही का ? सरकारने कोरोनाच्या नावावर लोकांना फक्त घाबरवायच का? असाही सवाल मनसेकडून केला गेलाय.