अटीतटीच्या सामन्यात दिल्लीच पारडं जड, मुंबईचा ६ गड्यानी पराभव
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी मुंबई इंडियन्सला क्विंटन डीकॉकच्या रुपात पहिला धक्का बसला. डीकॉकला यावेळी फक्त एकच धाव करता आली. पण त्यानंतर मात्र मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी दमदार फलंदाजी केली. या दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी रचली.रोहित आणि सूर्यकुमार आता मोठी धावसंख्या उभारणार, असे वाटत होते. पण यावेळी अव्हेश खानने सूर्यकुमारला बाद केले आणि मुंबईला दुसरा धक्का बसला. सूर्यकुमारला यावेळी ३४ धावा करता आल्या. सूर्यकुमार बाद झाल्यावर रोहितने काही काळ फलंदाजी केली खरी, पण त्याला यावेळी मोठी धावसंख्या उभारता आली नाही.रोहितने यावेळी यंदाच्या आयपीएलमधील सर्वाधिक धावा केल्या, पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. दिल्लीचा फिरकीपटू अमित मिश्राने यावेळी रोहित शर्माला बाद केले. रोहितने यावेळी ३० चेंडूंत ३ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ४४ धावा केल्या. अमित मिश्राने याच नवव्या षटकात रोहितनंतर हार्दिक पंड्यालाही बाद केले. यावेळी हार्दिकला भोपळाही फोडता आला नाही. हार्दिकनंतर कृणाल पंड्या आणि कायरन पोलार्डही लवकर बाद झाले आणि मुंबई इंडियन्सच्या संघाची ६ बाद ८४ अशी अवस्था झाली. पण त्यानंतर इशान किशन आणि जयंत यादव यांनी काही काळ चांगली फलंदाजी केली. पण अमित मिश्राने पुन्हा एकदा दिल्लीला यश मिळवून दिले आणि इशानची विकेट काढली. इशानने यावेळी २६ धावा केल्या.
आतापर्यंत मुंबई इंडियन्सच्या संघाकडून एकच चुक चारही सामन्यांमध्ये पाहायला मिळाली आहे, ती चुक म्हणजे त्यांच्या मधल्या फळीला आतापर्यंत मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. हार्दिक आणि कृणाल हे पंड्या बंधू आतापर्यंत चांगली फलंदाजी करण्यात अपयशी ठरले आहेत. पोलार्डने गेल्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती. पण आजच्या सामन्यात मात्र पोलार्डलाही मोठी खेळी साकारता आली नाही. त्यामुळेच मुंबई इंडियन्सच्या संघाला प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सपुढे १३८ धावांचे आव्हान ठेवता आले. लक्षचा पाठलाग करतांना दिल्ली ची सुरुवात चांगली झाली फक्त 1 विकेट्स गेली होती त्या नंतर धवन आणि स्मिथ मध्ये चांगली भागीदारी झाली नियमित वेळानी विकेट्स पडत होत्या मात्र धावा कमी असल्याने दिल्ली नी आरामात लक्षचा पाठलाग केला. दिल्लीकडून शिखर धवनने सर्वाधिक 45 धावा केल्या. तर स्टीव्ह स्मिथने 33 धावांची खेळी केली. तर मुंबईकडून जयंत यादव, कायरन पोलार्ड, राहुल चहर आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 1 विकेट घेतली.