भारत आणि पाकिस्तान मध्ये होऊ शकती टी20 मालिका
भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धींमध्ये २०२१मध्ये द्विदेशीय मालिका होणार असल्याचे वृत्त गुरुवारी येऊन धडकले आहे. जवळपास एक दशक उभय संघांमध्ये द्विदेशीय मालिका झालेली नाही. दोन्ही देशांतील राजकीय तणाव आणि पाकिस्तानातूनही दहशतवादी कृत्यांना मिळणाऱ्या खतपाणीमुळे भारतानं शेजारील राष्ट्राशी सर्व संबंध तोडले आहेत. २००७ मध्ये पाकिस्तानचा संघ पाच वनडे व तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात आला होता. त्यानंतर २०१२-१३ मध्ये भारत दौऱ्यावर पाकिस्तान मर्यादित षटकांची द्विदेशीय मालिका खेळला होता. पण, गुरूवारी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार उभय संघ पुन्हा एकदा द्विदेशीय मालिकेत भिडणार आहेत. २००८मध्ये भारतानं आशिया कप स्पर्धेसाठई पाकिस्तान दौरा केला होता. सध्याच्या घडीला हे दोन्ही संघ आशिया चषक व आयसीसीच्या स्पर्धेतच एकमेकांविरुद्ध खेळतात. २०१९च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान अखेरचे एकमेकांना भिडले होते. पण, आता दोन्ही देशांच्या चाहत्यांना सुखावणारी बातमी समोर येत आहे. यावर्षी जर सर्वकाही नियोजनानुसार पार पडले, तर भारत-पाकिस्तान यांच्यात टी-20 मालिका होईल. पाकिस्तान क्रिकेट मंडळाला तसे संकेत उच्चस्तरातून मिळाले आहेत. पाकिस्तानातील वृत्तपत्र जंग या संदर्भातले वृत्त प्रसिद्ध केलं आहे. त्यात त्यांनी पीसीबी सूत्राचा हवाला देताना नाव गुपित ठेवलं आहे. ”आम्हाला तयार राहण्यास सांगितले आहे,”असे त्या अधिकाऱ्यानं त्या ऊर्दू वृत्तपत्राशी बोलताना सांगितले आहे.