दुर्गम भागातील नागरीकांच्या लसीकरणावर लक्ष द्या – मुख्यमंत्र्यांचे आदेश
दुर्गम भागातील नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी आवश्यक सर्व सुविधा योग्य प्रकारे मिळतील याकडे विशेष लक्ष देण्यात यावे आणि लसीकरणानंतरदेखील नागरिकांनी मास्कचा वापर आणि शारीरीक अंतराचे पालन करावे यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात यावी, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
धडगाव येथे आयोजित जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी, कृषि मंत्री दादाजी भुसे, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, आमदार मंजुळा गावित, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत आदी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, शहरी भागात आरोग्याच्या सुविधा उपलब्ध असतात परंतु ग्रामीण आणि विशेषत: दुर्गम भागातील नागरिकांना अशा सुविधा मिळणे आवश्यक आहे. कोरोना संसंर्ग वाढण्याची शक्यता असल्याने प्रतिबंधक उपाययोजनांवर विशेष भर देण्यात यावा. कोविडचा धोका पुन्हा वाढला आहे. मात्र यावेळी एक ढाल म्हणून लसीकरणाची सुविधा आपल्याकडे आहे. लसीकरणाबाबत जनतेच्या मनातील शंका दूर करून लसीकरणाचा वेग वाढवाव. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वत्र पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. जिल्ह्याने जनजागृतीचे चांगले उपक्रम राबविले असून त्यात यापुढेही सातत्य ठेवण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.
तोरणमाळ पर्यटन विकास आराखडा तयार करा.
तोरणमाळ पर्यटन विकासाचा सूक्ष्म आराखडा तयार करावा, पर्यटन विकासाच्या माध्यमातून येथील रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी शासन सर्व सहकार्य करेल, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. ते म्हणाले विकास आराखडा तयार करताना प्राधान्यक्रम ठरविण्यात यावा. परिसरात पळसाची झाडे रांगेत लावण्यासारख्या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या संकल्पना राबवाव्या. लवकरच पर्यटन मंत्र्यांच्या समवेत याबाबत बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री पाडवी म्हणाले, जिल्ह्यात फळबाग लागवड कार्यक्रम राबविल्यास 200 डोंगर हिरवे होतील. त्यासाठी ग्रामपंचायतीचा सहभाग घेता येईल. जिल्ह्यातील आश्रम शाळांमधून सॅटेलाईट एज्युकेशन राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात मनरेगाच्या माध्यमातून यावर्षी विक्रमी फळबाग लागवड झाल्याचे कृषिमंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले.
विभागीय आयुक्त गमे यांनी विभागातील कोरोना परिस्थितीची तर जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची माहिती दिली.