पश्चिम बंगालमध्ये मतदानामध्ये हिंसाचार
सुरक्षा दलाकडून करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये चार जणांचा मृत्यू
पश्चिम बंगालमध्ये आज ४४ जागांसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. मात्र, यादरम्यान हिंसाचाराच्या दोन घटनांमुळे मतदान प्रक्रियेला गालबोट लागल्याचं दिसून आलं आहे. या प्रकारानंतर पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेचा निषेध केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कूचबिहारच्या सितालकुचीमध्ये भाजपा आणि तृणमूल काँग्रेसचे काही कार्यकर्ते हे आपापसात भिडले. या हाणामारीत अनेक लोक जखमी झाले आहेत. पोलिसांनी लाठीचार्ज करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान बूथ क्रमांक 285 मध्ये मतदान केंद्राबाहेर गोळीबार करण्यात आला. यामध्ये मतदान करण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला. तसेच सुरक्षा दलाकडून करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 4 जण जखमी झाले आहेत.