बाबासाहेब पुरंदरेंनी शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने पेरला :- अमोल मिटकरी
बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली. त्यांच्यात आणि गोपीचंद पडळकर यांच्यात रंगलेल्या शाब्दीक चकमकीवरसुद्धा त्यांनी भाष्य केलं आहे.
प्रश्न – तुमच्या भाषणांमध्ये तुम्ही कायम बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका करता, पण ज्यांच्याबरोबर तुम्ही शिवस्वराज्य यात्रा काढली ते अमोल कोल्हे मात्र त्यांचे प्रशंसक आहेत, ते त्यांच्या भेटी घेत असतात. मग पुरंदरेंवर राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका काय आहे?
उत्तर – 2014 ला जेव्हा तेव्हाच्या महाराष्ट्र सरकारने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित केला तेव्हा मी त्याचा कडाडून विरोध केला आहे.
बाबासाहेब पुरंदरेंच्या लिखाणाचं मी कधीही समर्थन करत नाही. आजही करत नाही आणि भविष्यातही करणार नाही. त्यांच्या राजा शिवछत्रपती या नाटकामध्ये राजमाता जिजाऊसाहेबांबद्दल अत्यंत वेगळ्या पद्धतीने त्यांनी लिखाण केलेलं आहे. मात्र शिवगंध पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर एक शिवप्रेमी म्हणून खासदार कोल्हे त्यांना भेटायला गेले असतील. तो खासदार साहेबांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र मला विचाराल तर मी बाबासाहेब पुरंदरेंचं समर्थन करणार नाही. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने पेरला आहे.
प्रश्न – राष्ट्रवाची अधिकृत भूमिका काय आहे?
उत्तर – राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका मला सांगता येणार नाही. त्याकाळात जितेंद्र आव्हाडसुद्धा होतो ना आज ते महाराष्ट्राचे मंत्री आहेत. आव्हाडांनीसुद्धा पुरंदरेंच्या पुरस्काराला विरोध केला आहे. एका कार्यक्रमामध्ये पवार साहेबांनीसुद्धा शिवाजी महाराज गोब्राह्मण प्रतिपालक नव्हते, अशी टिप्पणी केली आहे. त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुलेंनी कुळवाडीभूषण म्हणून मांडलेल्या विचारधारेला धरूनच शिवाजी महाराजांची प्रतिमा आमच्या पक्षात आहे.